मुळे कुटुंब मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून, गेल्या काही वर्षांपासून कडा येथील बसस्थानक परिसरात वास्तव्यास होते. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात वडील अनिल यांना दारूचे व्यसन होते. नशेत ते पत्नीवर वारंवार मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्रीही त्यांनी दारूच्या नशेत घरात वाद घातल्याने पत्नी आणि मुलगा वेगळ्या झोपडीत झोपायला गेले होते.
advertisement
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास दीर्घकाळ मनात साचलेल्या संतापातून करणने बाहेर झोपलेल्या वडिलांवर मोठा दगड फेकून हल्ला केला. या घटनेत अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पत्नी उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला.
विशेष म्हणजे, घटनास्थळी जवळपास 20 झोपड्या असतानाही रात्रीच्या शांततेत घडलेली ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. तसेच पंचनामा प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे मृतदेह काही काळ जागीच पडून राहिला होता. या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मुलगा खुलताबाद येथे असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, दोन महिन्यांत आष्टी तालुक्यातील ही दुसरी खूनाची घटना ठरली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृताच्या पत्नीने आयुष्यभर सहन केलेल्या अत्याचाराची व्यथा व्यक्त करत आता कुटुंबाच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






