एक गाणं, दोन आवाज आणि पुरस्काराचा वाद
१९९७ मध्ये आलेल्या 'बॉर्डर' सिनेमाने इतिहास घडवला. अनु मलिक यांचं संगीत आणि सोनू निगम व रूप कुमार राठोड यांच्या आवाजातील 'संदेसे आते हैं' हे गाणं घराघरांत पोहोचलं. सोनू निगमच्या करिअरला या गाण्याने एका वेगळ्या उंचीवर नेलं. साहजिकच, त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या गाण्यासाठी सोनूचं नाव 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक' म्हणून जाहीर झालं.
advertisement
सोनू निगमला जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा त्याने आनंदी होण्याऐवजी एक प्रश्न विचारला. सोनू म्हणाला, "हे गाणं मी आणि रूप कुमार राठोडजी, आम्ही दोघांनी मिळून गायलं आहे. मग पुरस्कारासाठी फक्त माझंच नामांकन का? रूपजींना यात स्थान का नाही?"
सोनू निगमने नाकारला प्रतिष्ठित पुरस्कार
त्यावेळच्या एका मुलाखतीत सोनूने हा किस्सा सविस्तर सांगितला होता. सोनू म्हणाला, "मी मड आयलंडला शूटिंग करत होतो आणि माझ्या एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला की तुला अवॉर्ड मिळतोय, तू सोहळ्याला जायला हवंस. मी त्याला विचारलं, रूपजींना नॉमिनेट केलंय का? तो म्हणाला नाही. मी त्याच क्षणी ठरवलं की जर रूपजींना डावललं जात असेल, तर मी हा पुरस्कार घेणार नाही. एकाच गाण्यासाठी दोघांनी मेहनत घेतली असताना एकालाच क्रेडिट देणं चुकीचं आहे. मी येऊ शकत होतो, तरीही मी गेलो नाही."
सोनू निगमचा हा पवित्रा पाहून संपूर्ण इंडस्ट्री चकित झाली होती. आपल्या सहकाऱ्याच्या हक्कासाठी स्वतःच्या करिअरमधला मोठा पुरस्कार नाकारण्याचं हे धाडस केवळ सोनूच दाखवू शकत होता.
'बॉर्डर २' ने दणाणून सोडलं बॉक्स ऑफिस
ज्या चित्रपटाने हा इतिहास रचला, त्या चित्रपटाचा आता सीक्वल आला आहे. 'बॉर्डर २' मध्ये पुन्हा एकदा तोच उत्साह पाहायला मिळतोय. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार युद्धभूमी गाजवत आहेत. सोबतच मोना सिंह, सोनम बाजवा आणि मेधा राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून प्रेक्षकांनी अक्षरशः हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे.
