घोषणा नसताना किमान भाड्यात वाढ
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते लालचौकी या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी अचानक भाडेवाढ केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी या मार्गावर 17 रुपये असलेले किमान भाडे थेट 20 रुपये आकारले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आदेश नसताना भाड्यात वाढ झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
या मार्गावर रोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. अचानक तीन रुपयांची वाढ जरी कमी वाटत असली तरी रोजच्या प्रवासात त्याचा आर्थिक भार वाढत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षा नाक्यावर यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या आहेत. रांगेत शिस्त नसणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, तसेच ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे मागणे अशा तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे हा रिक्षा वाहनतळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
तातडीने कारवाईची प्रवाशांची मागणी
संबंधित परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अधिकृत भाडे निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
