नक्की काय घडलं?
कल्याण रेल्वे स्थानकावर सकाळच्या गर्दीत एका महिलेला अज्ञात महिलेने चावा घेतला आणि बोट पिरगळले. जखमी महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
लोकलमधील गर्दी अन् विकृत संताप
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळच्या गर्दीच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली. कल्याण रेल्वे स्थानक येथे मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढताना एका महिलेला अज्ञात महिलेने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 6 वर घडली.
advertisement
तक्रारदार महिला कल्याण पूर्व येथील मलंगगड रोड परिसरात राहतात आणि अंधेरी येथे नोकरी करतात. त्या नेहमीप्रमाणे प्रथम श्रेणीच्या डब्यात चढत होत्या. त्यावेळी डब्यात प्रचंड गर्दी होती. काही महिला उतरत असताना गोंधळ निर्माण झाला. याच वेळी एका अनोळखी महिलेने त्यांना चढण्यापासून रोखले आणि दरवाजातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला.
या झटापटीदरम्यान त्या अनोळखी महिलेने तक्रारदारांच्या दंडाला चावा घेतला आणि त्यांच्या हाताचे बोट जोरात पिरगळले. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. कामावर उशीर होऊ नये म्हणून त्यांनी त्याच लोकलने प्रवास सुरू ठेवला. मात्र संध्याकाळी दुखापत वाढल्याने त्यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सकाळच्या गर्दीत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
