छत्रपती संभाजीनगर : एखाद्या महिलेसाठी आई होणं हे जगातील सगळ्यात मोठं सुख मानलं जातं. परंत, हेच आई होणं आरोग्याच्या दृष्टीनं आव्हानात्मक देखील असतं. अशा काळात परिस्थितीमुळं अनेक महिलांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे गरोदर माता व नवजात बालकांच्या मृत्यूजा धोका असतो. त्यासाठी केंद्र सरकारने ‘जननी सुरक्षा योजना’ सुरू केलीये. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी माहिती दिलीये.
advertisement
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत गरोदर महिलांच्या सर्व तपासण्या आणि बाळाची प्रसुती मोफत केली जाते. तसेच या योजनेत गर्भवती महिलांचे आरोग्य संरक्षण आणि सुरक्षित प्रसूती निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य केले जाते. प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गरोदर महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा निर्णय, राज्यातील या सोसायटीने निर्णय घेतला, वसुली बंद!
कसा करायचा अर्ज?
या योजनेंतर्गत गरोदरपणात बाळाची काळजी घेण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेचे वय 19 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजे आहे. दोन मुलांपर्यंतच या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेसाठी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज घेता येतो. तसेच ऑनलाईनही फॉर्म डाऊनलोड करता येतो. आवश्यक कागदपत्रे जोडून आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये अर्ज जमा करता येईल, असं जिल्हा आरोग्य अधिकारी सांगतात.
गरोदर मातांना आर्थिक मदत
केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूत झालेल्या महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. यामध्ये ग्रामीण व शहरी महिलांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलीये. शहरात राहणाऱ्या महिलांसाठी 1000 तर ग्रामीण महिलांसाठी 1400 रुयपे दिले जातात. तसेच सिझरियनसाठी 1500 रुपयांची आर्थिक तरतूद आहे. जननी सुरक्षा योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे (एसबीटी) थेट रक्कम जमा केली जाते. यासाठी पात्र असलेल्या महिलांचे आधारकार्ड हे बँकेशी लिंक्ड असणे आवश्यक आहे.
संभाजीनगरमध्ये 5 हजार महिलांना मदत
गेल्या 11 महिन्यांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 हजारांवर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शासकीय रुग्णालयातील प्रसुतीच्या प्रमाणात वाढ व्हावी आणि माता व बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी शासनाने जननी सुरक्षा योजना कार्यान्वित केली आहे, असेही डॉ. धानोरकर यांनी सांगितले.





