शिमला : पूर्वी एका ठराविक वयानंतर अंधुक दिसू लागायचं. मग चष्मा लावण्याची वेळ यायची. आता मात्र अगदी शालेय विद्यार्थ्यांनाही चष्मा लावावा लागतो. नाहीतर फळ्यावर लिहिलेलं दिसत नाही. अशा परिस्थितीत एकदा का डोळ्यांना नंबर आहे हे कळताच तो कमी करण्यासाठी अनेकजण अनेक उपाय सूचवतात. कोणी म्हणतं भरपूर गाजर खा, तर कोणी म्हणतं सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो. परंतु हे कितपत खरं आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
डॉ. प्रवीण पंवर सांगतात की, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे दावे करतात, ज्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसतो. मात्र लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात. प्रत्येकाची वाढत्या वयासह शारीरिक वाढ होते. त्यासोबतच आयबॉलचा आकारही वाढतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला लहानपणी चष्मा लागला असेल तर त्या चष्म्याचा नंबर वाढत्या वयासह कमी होऊ शकतो. परंतु ही एकच परिस्थिती आहे ज्यामुळे चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त हा नंबर कमी करता येत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी खा Fiber Rich Food! अन्नपचन होईल सुरळीत
त्यामुळे कोणीही अमुक अमुक उपायामुळे चष्म्याचा नंबर हळूहळू कमी होईल असं सांगत असेल तर ते चुकीचं आहे. चष्मा वेळोवेळी लावल्यानं नंबर स्थिर राहू शकतो, परंतु हा नंबर सहजासहजी कमी होत नाही. याउलट जर नंबर असतानाही चष्मा लावला नाही, तर मात्र नंबर आणखी वाढू शकतो.
काळजी काय घ्यावी?
बाहेरून कुठूनही घरी आल्यानंतर हातपाय धुवावेच, परंतु डोळे आवर्जून धुवावे. याव्यतिरिक्तही दिवसभरातून दोनवेळा डोळे थंड पाण्याने धुवा. शिवाय आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुदृढ राहतं. या भाज्यांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुणधर्म डोळ्यांसाठी आवश्यक असतात.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. परंतु आपण आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.