अमरावती : महिलांचे लांब केस हे त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे अनेक महिला आपल्या केसांची काळजी करण्यात काहीच कमी करत नाहीत. पण, तरीही हिवाळा सुरू झाला की, केस गळती सुरू होते. केसांना फाटे फुटतात. यावर किती उपाय केले तरी काहीच फरक पडत नाही. कारण यासाठी आपला आहार महत्वाचा असतो. पोषक आहार घेतल्या शिवाय केस आणि त्वचा हेल्दी राहत नाही. त्यासाठी कोणता आहार घ्यावा, हे माहीत असणे गरजेचे आहे. सुंदर आणि निरोगी केसांसाठी दैनंदिन आहार कसा असावा?याबाबत लोकल 18 ने त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी चर्चा केली.
advertisement
डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, आपण काय खावं? या पेक्षा काय खाणं टाळावं? यावर जर लक्ष दिले तर आपल्या केसांचे आरोग्य व्यवस्थित राहते. आपल्या केसांचे आरोग्य हे आपण घेतलेल्या आहारावर अवलंबून आहे. सुंदर आणि सतेज केस हे आपला आहार व्यवस्थित असल्याचे लक्षण आहे. पांढरे झालेले, फाटे फुटलेले, सुकलेले केस हे आपण आहार व्यवस्थित घेत नाही हे दर्शविते.
हसताय ना? हसायलाच पाहिजे! फायदे भन्नाट...डॉक्टरांकडे जायची वेळ नाही येणार
पुढे त्या सांगतात की, आपण घेतलेल्या आहाराचे पचन होऊन मल बाहेर पडणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपण अन्न सेवन करतोय आणि आपल्याला बाहेरचं जावे लागत नसेल तर आपली पचनक्रिया व्यवस्थित नाही. त्यामुळे सुद्धा आपले केस सुकलेले आणि व्यवस्थित दिसत नाहीत. कारण त्याला पोषणच मिळत नाही. त्यांनतर बाहेरील अन्न पदार्थ नेहमी सेवन केल्याने सुद्धा आपल्या शरीरात अनेक विषारी घटक निर्माण होतात. त्याचा परिणाम स्किन आणि केसांवर होतो. त्यामुळे बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. किंवा नेहमी खाऊ नये. हे जर आपण खाणे टाळले तर आपले अर्धे आरोग्य तिथेच सुधारते.
आहार कसा असावा?
आपल्या दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या, फळ, मोड आलेले कडधान्य असायला पाहिजे. मोड आलेले कडधान्ये हे शिजवून न खाता ते कच्चे खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो. दररोज कोणतेही एक फळ खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. एकदम महाग फळ खावं असं नाही तुम्ही कोणतेही एक फळ खाऊ शकता.
जेव्हा जेव्हा तुम्हाला चॉकलेट खावेसे वाटते तेव्हा तुम्ही खजूर खायला पाहिजे. त्यामुळे केसांना अधिक पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. म्हणजेच जे पदार्थ शरीराला आवश्यक असतात त्याचे सेवन करून आपल्या आरोग्याचा समतोल राखता येतो. आरोग्याचा समतोल राखला गेला की केस आणि त्वचा आपोआप निरोगी राहते, असे डॉ. टाकरखेडे यांनी सांगितले.





