उपाशीपोटी फळ खाण्याचे फायदे
आहार मार्गदर्शक सोनाली अढाऊ सांगतात की, उपाशीपोटी फळांचे सेवन केल्याने त्वरित ऊर्जा मिळते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. उपाशीपोटी खाल्ल्यास ही साखर लगेच शोषली जाऊन शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. त्यानंतर पचनक्रिया देखील सुधारते. पपई, संत्रे, सफरचंदासारखी फळे पचनाला मदत करतात. उपाशीपोटी खाल्ल्यास आतड्यांची स्वच्छता होऊन कब्जाच्या समस्येत आराम मिळतो.
advertisement
वजन नियंत्रण
फलाहारामुळे वजन देखील नियंत्रित करता येते. फळांमध्ये फायबर भरपूर असल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाऊन वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते. फळांमधील जीवनसत्वे व अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते. तसेच त्वचा आणि केस निरोगी राहतात. फळांमधील पाणी, खनिजे आणि जीवनसत्वांमुळे त्वचेला पोषण मिळते. त्यामुळे केस गळती कमी होते. उपाशीपोटी फळांचे सेवन केल्याने हे सर्व फायदे होतात.
उपाशीपोटी फळ खाण्याचे तोटे
उपाशीपोटी फळांचे सेवन केल्याने आम्लपित्त व जळजळ होऊ शकते. काही लोकांना उपाशीपोटी संत्रे, मोसंबी, अननसासारखी आम्लयुक्त फळे खाल्ल्याने ॲसिडिटी वाढते. तसेच अपचनाचा धोका देखील वाढतो. केळी किंवा द्राक्षे उपाशीपोटी खाल्ल्यास पचन मंदावून पोटात गॅस होऊन फुगल्यासारखे वाटू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती असते. मधुमेह असणाऱ्यांनी उपाशीपोटी गोड फळे जसे की, द्राक्ष, आंबा, पिकलेली केळी खाणे टाळावे, कारण त्यामुळे शुगर लेव्हल अचानक वाढू शकते.
फळे खाण्याची योग्य वेळ?
आम्लपित्त किंवा पोटदुखीची समस्या असणाऱ्यांनी फळे उपाशीपोटी न खाता नाश्त्यानंतर खाणे योग्य ठरते. मुलांना आणि वृद्धांना हलकी, पचायला सोपी फळे सकाळी द्यावीत. दिवसातून वेगवेगळ्या प्रकारची फळे खाल्ल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात.
उपाशीपोटी फळ खाणे अनेक बाबतीत फायदेशीर आहे. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने योग्य फळांची निवड आणि प्रमाण महत्त्वाचे ठरते. डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन फळांचा समतोल आहारात समावेश केल्यास ते आरोग्य टिकवण्यासाठी सर्वोत्तम ठरते, असं त्यांनी सांगितलं.