मेकअप काढताना कोणत्या चुका टाळाव्यात?
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, केवळ पाण्याने चेहरा धुतल्यास मेकअप पूर्णपणे निघत नाही. काही महिला साबण वापरतात. परंतु त्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील बनते. डोळ्यांचा मेकअप जोरात चोळून काढण्याची चुकीची सवय अनेकांना असते. यामुळे डोळ्यांभोवती बारीक सुरकुत्या निर्माण होतात आणि पापण्या गळण्याचा धोका वाढतो. काही वेळा महिलांना थकवा असल्याने त्या मेकअप न काढताच झोपतात, मात्र यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात. आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे संपूर्ण मेकअप एकाच कॉटनने पुसणे. या प्रक्रियेमुळे चेहऱ्यावर जंतुसंसर्ग होऊ शकतो.
advertisement
Identifying New Potato : बटाटे नवीन आहेत की रासायनिक प्रक्रिया केलेले? या पद्धतीने ओळखणं होईल सोपं
काही महिला फक्त वाइप्स वापरतात, पण त्यामुळे मेकअप काही प्रमाणातच निघतो आणि त्वचेत रसायनं शिल्लक राहतात. तसेच मेकअप काढल्यानंतर मॉइश्चरायझर न लावल्याने त्वचा कोरडी पडते आणि नंतर जास्त तेलकट होण्याचा त्रास वाढतो. यासर्व चुका टाळणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते.
मेकअप काढण्याची योग्य पद्धत कोणती?
मेकअप योग्य पद्धतीने काढण्याची प्रक्रिया अगदी साधी आहे. सर्वात आधी हात व्यवस्थित धुवून घ्यावेत. जेणेकरून चेहऱ्यावर जंतूसंसर्ग होऊ नये. त्यानंतर डोळ्यांचा मेकअप आधी काढावा. यासाठी कॉटनवर मेकअप रिमूव्हर किंवा घरगुती पर्याय म्हणून नारळ तेल वापरता येऊ शकतं. हे कॉटन 15 सेकंद हलक्या दाबाने डोळ्यांवर ठेवावं आणि मग सावकाश पुसून टाकावं. डोळ्यांनंतर ओठांचा मेकअप दुसऱ्या कॉटनने हळुवारपणे पुसावा. नंतर संपूर्ण चेहऱ्यावर रिमूव्हर लावून गोलाकार मसाज करावा, यामुळे मेकअप सहज सैल होतो. मग कोमट पाण्याने चेहरा धुवावा. पुढच्या टप्प्यात हलक्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ करावा, ज्यामुळे उरलेले रसायनं आणि मेकअपचे अंश पूर्णपणे निघून जातात. शेवटी हलका क्रीम किंवा अॅलोवेरा जेल लावल्यास त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणापासून बचाव होतो, अशी माहिती त्यांनी दिली.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीला मेकअप करणं जितकं आनंददायी असतं तितकंच तो योग्य पद्धतीने काढणंही अत्यावश्यक आहे. चुकीच्या पद्धतीमुळे त्वचेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं. त्यामुळे दरवेळी योग्य प्रक्रिया वापरून चेहरा स्वच्छ ठेवावा. म्हणूनच महिलांनी डोळे, ओठ, चेहरा, फेसवॉश, मॉइश्चरायझर हा क्रम नेहमी लक्षात ठेवावा. सणानंतर काही क्षण स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दिल्यास चेहरा कायमस्वरूपी तजेलदार आणि निरोगी राहू शकतो, असेही त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.