अनेकदा काहीजणांना अस्वस्थता, थकवा आणि सुस्ती जाणवते. खूप कामानंतर जसा थकवा येतो त्याप्रमाणे काहींचं शरीर पूर्णपणे थकून गेल्यासारखं वाटतं. या लक्षणांबद्दल, केआयएमएस रुग्णालयाचे प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. एस. एम. फयाज यांनी माहिती दिली.
सतत थकवा जाणवणं, चक्कर येणं, रात्री झोप न येणं, न समजणारी अंगदुखी आणि विचार करण्याची क्षमता कमी होणं या सामान्य गोष्टी नाहीत. याकडे दुर्लक्ष करू नये; ही एखाद्या गंभीर समस्येचा इशारा देणारी चिन्हं असू शकतात असं डॉक्टरांनी म्हटलंय.
advertisement
Eye Health : झोप आणि डोळ्यांचं आरोग्य, अपुऱ्या झोपेचं आणि डोळ्यांचं काय आहे कनेक्शन ?
आपल्या शरीरात गंभीर समस्या एका रात्रीत निर्माण होत नाहीत; एखादा गंभीर आजार होण्यापूर्वी शरीरात हळूहळू लक्षणं जाणवतात. ही लक्षणं विशेष गंभीर नसतात, पण ती सातत्यानं दिसून येतात.
डॉ. फयाज यांच्या मते, चयापचयातील बदल, पचनाच्या समस्या, थायरॉईडच्या समस्या आणि इन्सुलिन प्रतिरोध यांसारख्या अनेक आरोग्य समस्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा ओळखता येत नाहीत.
थायरॉईड आणि रक्तातील साखरेची पातळी दिवसभरात कमी-जास्त होऊ शकते, पण त्याची स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत असा याचा अर्थ होतो. आयसीएमआरनुसार, चयापचयाच्या समस्या हळूहळू आणि नकळतपणे विकसित होतात आणि मग दिसतात. एखादा मोठा आजार लक्षात येण्यापूर्वीच शरीरात अनेकदा बदल घडून येतात, म्हणूनच एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असले तरी तिच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य दिसू शकते.
आपण अनेकदा दुर्लक्ष करत असलेल्या काही सामान्य समस्यांमध्ये व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डीची कमतरता, थायरॉईडच्या समस्या आणि अपुरी झोप यांचा समावेश होतो. हे बदल लहान असले तरी शरीरावर त्यांचे महत्त्वपूर्ण परिणाम होतात.
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि मनःस्थितीत चढ-उतार होऊ शकतात, निर्जलीकरणामुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे थकवा आणि डोकेदुखी होऊ शकते, आणि झोपेच्या कमतरतेमुळे ऊर्जेची कमतरता भासू शकते. या समस्या हळूहळू विकसित होतात, तेव्हा त्यांची लक्षणं स्पष्ट दिसू लागतात.
वारंवार चाचण्या करण्याऐवजी, आपली जीवनशैली सुधारून निरोगी राहणं अधिक चांगलं ठरतं. झोप, आहार, पाणी, व्यायाम आणि तणाव यांचा योग्य समतोल राखणं अधिक फायदेशीर असल्याचं डॉ. फयाज यांनी म्हटलंय.
वर सांगितलेली लक्षणं ओळखणं देखील महत्त्वाचं आहे. ती केव्हा उद्भवतात, का उद्भवतात आणि किती काळ टिकतात हे जाणून घेणं गरजेचं ठरतं. चांगली झोप, सकस आहार आणि नियमित व्यायाम यांसारख्या लहान सुधारणांमुळे मोठ्या समस्या टाळता येतात. ही लक्षणं दीर्घकाळ टिकून राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याकडे दुर्लक्ष करू नका.
