रांची : अनेकजण महाराष्ट्रातून गोव्याला, दिल्लीला किंवा इतर कोणत्याही राज्यात ट्रेनने प्रवास करतात. अत्यंत सुंदर असं निसर्ग पाहत हा प्रवास सुखद होतो. लांबचा प्रवास असल्यामुळे ट्रेनचं तिकीटही तितकंच महागडं असतं. या तिकीटाचा वापर केवळ ट्रेनमध्ये बसण्यासाठी होत नाही, तर यापलिकडेही त्याचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला कदाचित माहित नसतील. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या रेल्वे प्रशासनाचे सिनिअर डिव्हिजनल कमर्शिअल मॅनेजर निशांत कुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
जर तुमच्याकडे रेल्वेच्या जागेचं आरक्षित तिकीट असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या वस्तीगृहात किंवा विश्रांती कक्षात अगदी 150 रुपयांत 24 तास राहू शकता. भारतीय रेल्वेतील एसी डबे 1, 2 आणि 3 मध्ये उशी, चादर आणि गोधडी मोफत मिळते. गरीब रथ गाडीतही या सुविधा असतात. जर एसी डब्यात तुम्हाला या सुविधा मिळाल्या नाही तर तुम्ही ट्रेनचं तिकीट दाखवून त्या मिळवू शकता. त्यासाठी अजिबात अतिरिक्त शुक्ल भरावं लागत नाही. ट्रेनमध्ये प्रवास करताना जर तुम्हाला अस्वस्थ वाटलं, तुमची तब्येत बिघडली, तर तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी सुविधाही मिळू शकते. ट्रेनममध्येच प्रथमोपचाराची पूर्ण व्यवस्था असते. त्यासाठी तुम्हाला केवळ याबाबत आरपीएफ जवानांना सांगावं लागेल. 139 क्रमांकावर कॉल केल्यासही तुम्हाला ही सुविधा मिळते. महत्त्वाचं म्हणजे ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल अशी सुविधा ट्रेनमध्ये उपलब्ध नसेल तर पुढच्या स्टेशनवर ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
हेही वाचा : खवय्यांसाठी पर्वणी! ‘इथं’ चक्क मिळतीय चिझ मिसळ थाळी, किंमत किती? पाहा PHOTOS
जर तुम्ही राजधानी, दुरंतो, शताब्दी यांसारख्या प्रीमियम ट्रेनचं तिकीट काढलं असेल आणि जर तुमची ट्रेन 2 तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने आली तर तुम्हाला आयआरसीटीसीच्या कँटीनमध्ये मोफत जेवण मिळू शकतं. जर तुम्हाला ही सुविधा मिळाली नाही, तर तुम्ही 139 नंबरवर फोन करून तक्रार करू शकता. सर्व रेल्वे स्टेशनवर लॉकर रूम आणि क्लॉक रूमची सुविधा असते. तुम्ही जवळपास महिनाभर या रूममध्ये सामान ठेवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला 50 ते 100 रुपये भरावे लागतात. 24 तासांनुसार पैसे द्यावे लागतात. परंतु यासाठी तुमच्याकडे ट्रेनचं तिकीट असणं आवश्यक आहे.
ट्रेनमधून उतरल्यावर आणि ट्रेनमध्ये चढण्याआधी तुम्ही एसी किंवा नॉन एसी वेटिंग रूममध्ये आराम करू शकता. यासाठीसुद्धा तिकीट आवश्यक आहे. शिवाय यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रेनने प्रवास कराल तेव्हा आपल्या तिकीटाचा फायदा नक्की घ्या. जर यापैकी कोणतीही सुविधा मिळाली नाही, तर 139 नंबरवर फोन करून तक्रार करा.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा