मुंबई: सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील जिवंत स्मारकं मानल्या जाणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जागृती वाढत आहे. मुंबईतील काही तरुणांनी देखील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईपासून जवळच असणारा वसई किल्ला हे मुंबईकरांचं हक्काचं पर्यटनस्थळ आहे. परंतु, या किल्ल्यावर पर्यटकांनी केलेल्या अस्वच्छतेची समस्या मोठी आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर तरुणांच्या गटाने वसई किल्ल्यावर स्वच्छता करत जवळपास अर्धा टन कचरा साफ केला. विशेष म्हणजे हे तरुण सातत्याने विविध किल्ल्यांवर अशा मोहिमा राबवत असतात. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
वसईचा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील वसई समुद्रकिनाऱ्यालगत वसलेला आहे. हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आपल्या भव्य इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या ऐतिहासिक किल्ल्यावर अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. गडावर स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या मुंबईतील एक गड संवर्धन कार्य करणाऱ्या तरुणांना वसई किल्ल्यावर जवळपास अर्धा टन कचरा सापडला. गडावर सापडलेल्या कचऱ्यात दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पाकीट आणि इतर कचरा समाविष्ट होता, असं शिवप्रेमी रवी कवडे यांनी सांगितलं.
Shiv Jayanti: असाही शिवप्रेमी! अवघ्या 9 वर्षांचा चिमुकला, कामगिरी पाहाल तर आवाक व्हाल!
प्रशासनाने किल्ल्यावर सुरक्षा रक्षक नेमले असले तरी, पर्यटकांनी नियमांची पायमल्ली करून गडावर कचरा टाकला आहे. गड संवर्धन करणारी तरुण मंडळी सांगतात की, “वसई किल्ल्यावर सुरक्षा असूनही, इथे दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा सापडतो. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचा अवमान आहे.” वसई किल्ला आता प्रशासनाने एक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे, इथे येणाऱ्या पर्यटकांची जबाबदारी वाढली आहे, आणि गडावर कचरा टाकण्याचे कार्य थांबविणे अत्यंत आवश्यक आहे, असं आवाहनही या तरुणाईनं केलयं.
गड संवर्धन करणारी ही तरुण मंडळी दर रविवारी आपल्या कामातून वेळ काढून गड संवर्धन मोहीम राबवतात. या मोहिमेद्वारे ते मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची साफसफाई करतात, यांनी आत्तापर्यंत वसई किल्ला, रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, सोंडाई, विसापूर, लोहगड, पन्हाळा आणि शिवनेरी या किल्ल्यावर गड संवर्धन मोहीम राबवली आहे. गड- किल्ल्याच्या स्वच्छतेची जाणीव ठेवून पर्यटकांनी किल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे. पर्यटनस्थळांवरील स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे, आणि ती पाळली गेल्यास किल्ल्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा शाश्वत राहील, असं आवाहन हे तरुण करतात.
दरम्यान, महाराष्ट्रभरातील हजारो तरुण मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या रक्षणासाठी समर्पित आहेत. ते नुसते स्वच्छता करत नाहीत, तर या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, देखभाल आणि प्रचार करण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. किल्ल्यांची स्वच्छता आणि त्याच्या वारशाचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जर सर्वजण यामध्ये भाग घेत असतील, तर किल्ल्यांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पिढ्यानपिढ्या सुरक्षित राहील.