वजन का वाढतं ?
वजन कमी करण्याआधी ते का आणि कोणत्या कारणामुळे वाढतं हे जाणून घेतलं तर वजन कमी करणं सहज सोपं आणि शक्य होतं. वजन वाढण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी अपुरी झोप, जंकफूडचं अतिसेवन, ताणतणाव आणि पचनक्रियेत बिघाड ही महत्त्वाची कारणं मानली जातात. कारण जर खाल्लेलं अन्न जर नीट पचत नसेल तर ते फॅटसच्या रूपाने शरीरात साठत जातं. ज्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यांचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो.
advertisement
वजन कमी करण्यासाठी वापरा किचनमधले पदार्थ
जीरं, मेथी, आलं, दालचिनी, लिंबू या सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतातच. याशिवाय घरात असलेली तुळसही वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण सकाळी गरम पाणी पितात. मात्र फक्त गरम पाणी पिण्यापेक्षा मेथीचं पाणी, जीऱ्याचं पाणी, लिंबू पाणी, तुळस आणि आल्याचं पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने जास्त फायदे होतील. यामुळे आतड्यतली घाण निघून जाते. आतडं आतून साफ व्हायला मदत होते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारून वजन कमी व्हायला मदत होते.
आता जाणून घेऊयात आरोग्यासाठी फायदेशीर ड्रिंक्स तयार करण्याची योग्य पद्धत
मेथीचं पाणी :
मेथी ही आरोग्यासाठी फायद्याची मानली जाते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही मेथीचं पानं आणि मेथीच्या दाण्यांचाही वापर करू शकता. एका ग्लासमध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजवत ठेवून सकाळी ते पाणी पिऊ शकता. सकाळी उठल्यावर तुम्हाला गरम पाणी प्यायचं असेल तर मेथीचे दाणे किंवा मेथीची पानं उकळवून ते पाणी सुद्धा पिऊ शकता.
जिऱ्याचं पाणी :
वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खूप फायदेशीर आहे. जिराच्या पाण्यात थायमॉल आणि इतर संयुगे असतात जी शरीराचा चयापचय दर वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात. यामुळे पचन सुधारतं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजेच जिरं रात्रभर भिजत ठेवून किंवा सकाळी उठाल्यावर गरम पाण्यातूनही घेऊ शकता.
तुळस आणि आलं :
वजन कमी करण्यासाठी काही जण ग्रीन टी,ब्लॅक टी, ग्रीन कॉफी पितात. मात्र कधीतरी आलं घातलेला तुळशीचा चहा पिऊन बघा. आलं आणि तुळशीच्या औषधी गुणधर्मांमुळे तुम्हाला दुहेरी फायदे एकाच वेळी मिळतील.
हे सुद्धा वाचा : वजन कमी करायचं आहे ? प्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याचा ‘हा’ चहा
पुदीना, लिंबू आणि मध :
वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिण्याचा सल्ला अनेक जण देतात. असं पाणी प्यायल्याने अनेकांना फायदे झाले असले तरीही मधाच्या वापराविषयी मतांतरं आढळून येतात. काहींच्या मते मधात असलेल्या साखरेमुळे डायबिटीस वाढू शकतो. त्यामुळे ज्यांना आधीपासूनच डायबिटीसचा त्रास आहे अशा व्यक्तींनी मधाचा वापर हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. त्यामुळे ज्यांना मध नकोय त्यांनी मधाऐवजी पुदीनाचा वापर करावा.
दालचिनीचं पाणी किंवा दालचिनीचा चहा :
वजन कमी करण्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी दालचिनीचं पाणी खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यांपासून दालचिनीच्या पाण्यामुळे आराम मिळू शकतो. याशिवाय दालचिनीचं पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदय मजबूत ठेवण्यास देखील मदत करू शकते. मात्र दालचिनीही उष्ण प्रवृत्तीची असल्यामुळे जास्त प्रमाणात दालचिनी खाल्ली तर ॲसिडिटी किंवा जळजळीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दालचिनीचा वापर योग्य त्या प्रमाणातच करावा. दालचिनीचा चहा प्यायल्याने जर तुम्हाला काही त्रास झाला तर थेट डॉक्टरांशी संपर्क साधा.