अनेकांना असं वाटतं की मद्य हे अन्नासारखं पचायला वेळ लागतं, पण वास्तव वेगळं आहे. अल्कोहोल थेट रक्तात मिसळतं आणि मेंदूपासून यकृतापर्यंतच्या महत्त्वाच्या अवयवांवर ताबा मिळवायला सुरुवात करतं. नक्की काय घडतं त्या पहिल्या 15 मिनिटांत? आणि रिकाम्या पोटी मद्यपान करणं किती घातक ठरू शकतं? तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने समजून घेऊया.
पहिल्या 15 मिनिटांचा थरार
advertisement
कैलाश दीपक हॉस्पिटलच्या डॉ. मानसी निगम यांच्या मते, मद्यपान केल्यावर अवघ्या 10 ते 15 मिनिटांत ते शरीरात शोषलं जाऊ लागतं. अल्कोहोलचा काही भाग जठरात शोषला जातो, तर उरलेला भाग लहान आतड्यातून थेट रक्तप्रवाहात प्रवेश करतो. रक्तावाटे हे अल्कोहोल काही मिनिटांतच मेंदूपर्यंत पोहोचतं. यामुळेच तुम्हाला लगेच हलकं किंवा रिलॅक्स वाटू लागतं. पण खरं तर, हे तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचा वेग मंदावल्याचं लक्षण असतं.
मेंदूवरचा ताबा आणि बदलणारा स्वभाव
अल्कोहोलचा सर्वात पहिला आणि मोठा परिणाम मेंदूवर होतो. तुमची विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची ताकद आणि भावनांवरचं नियंत्रण ढळू लागतं. सुरुवातीला काही लोकांना ताजेतवाने वाटते. पण प्रमाण वाढल्यावर बोलण्यात तोतरेपणा येतो, शरीराचा समन्वय सुटतो आणि प्रतिकिया देण्याचा वेग मंदावतो. रिकाम्या पोटी किंवा घाईघाईने मद्यपान केल्यास चिडचिडेपणा, विनाकारण खूप बोलणे किंवा अचानक शांत होणे असे मानसिक बदल दिसू शकतात.
शरीरात जाणवणारी उब खरी की खोटी?
मद्यपान केल्यावर शरीर उबदार वाटतं, त्वचा लालसर होते. हे रक्तवाहिन्या विस्तारल्यामुळे घडतं. यामुळे रक्तदाब थोडा कमी होतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. पण डॉ. निगम सावध करतात की, ही उब नैसर्गिक नसते. उलट, यामुळे शरीर वेगाने उष्णता गमावत असतं आणि अंतर्गत तापमान कमी होतं. यामुळेच काही लोकांना चक्कर किंवा अस्वस्थता जाणवते.
यकृत आणि किडनीवर येणारा ताण
जेव्हा तुम्ही मद्य घेता, तेव्हा तुमच्या शरीरातील यकृत बाकी सर्व कामं सोडून ते अल्कोहोल पचवण्याच्या कामात जुंपलं जातं. एका युनिट अल्कोहोलवर प्रक्रिया करायला यकृताला साधारण 1 तास लागतो. यामुळे शरीरातील चरबी (Fat) जाळण्याची प्रक्रिया मंदावते.
किडनी (Kidney):
अल्कोहोलमुळे लघवीचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन (Dehydration) होतं. यामुळे इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडून स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो.
रिकाम्या पोटी मद्यपान: आगीत तेल
न्यूट्रेस लाईफस्टाईलच्या डॉ. रोहिणी पाटील यांच्या मते, पोटात अन्न नसेल तर अल्कोहोल अतिशय वेगाने रक्तात मिसळतं. जर तुम्ही प्रथिने किंवा फॅट्सयुक्त पदार्थ खाल्ले असतील, तर अल्कोहोल शोषण्याचा वेग मंदावतो आणि त्याचा त्रास कमी होतो. पण रिकाम्या पोटी घेतलेला एक पेग सुद्धा लिव्हरवर मोठा ताण देतो.
व्यक्तीनुसार होणारे बदल
अल्कोहोलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखा नसतो. तुमचं वजन, वय, चयापचय शक्ती आणि तुम्ही घेत असलेली औषधं यावर ते अवलंबून असतं. वाढत्या वयानुसार शरीर अल्कोहोलला अधिक संवेदनशील होतं, त्यामुळे वयस्कर व्यक्तींना याचा त्रास लवकर होतो.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
