प्रमिला कंदीलवार लोकल 18 शी बोलताना सांगतात की, मी आणि सुमनताई लहानपणापासूनच मध काढण्याचे काम करत आलो आहे. पण, त्यात अनेक चुका आम्ही करत होतो. त्यामुळे मधमाशी दंश करायची. त्यांनतर आम्ही शिवस्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतले आणि आमच्या चुका सुधारण्यात आम्हाला मदत झाली. तेव्हापासून आम्ही हे काम व्यवस्थितपणे करत आहोत. 20 मे 2025 रोजी मधुमक्षिका दिनानिमित्त आमझरी येथे कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आम्हाला मधुसखी म्हणून संबोधण्यात आले. तेव्हापासून आम्हाला मेळघाटमध्ये मधुसखी म्हणून ओळखल्या जात आहे.
advertisement
मध काढताना काय काळजी घ्यायला पाहिजे?
मध काढताना मधमाशी दंश का करते? याबाबत बोलायचे झाल्यास सर्वात आधी येईल ती म्हणजे मध काढण्याची चुकीची पद्धत. अनेकांना सवय असते की, पोळ दिसल्यानंतर त्यावर दगड मारतील. त्यानंतर धूर करून मध काढण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी मधमाशी दंश करतेच. कारण ती सजीव असल्याने त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यावेळी जे योग्य वाटते ते त्या करतात. पण, मध काढायला जाण्याआधी काही बाबी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहेत. त्या पुढीलप्रमाणे,
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही धूर करून मध काढू नये. कारण मधमाशीना धूर आवडत नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची दुर्गंधी सुद्धा त्यांना चालत नाही. परफ्यूम किंवा इतर कोणताही सेंट सुद्धा त्याठिकाणी जाताना टाळायला पाहिजे. मध काढायला जाण्याआधी स्वच्छ आंघोळ करून जाणे महत्वाचे आहे. यासर्व बाबी आपण लक्षात ठेवून मध काढण्यासाठी गेलो आणि त्यांना कोणतीही इजा केली नाही, तर मधमाशी दंश करत नाही. कारण त्यांना सुद्धा प्रेमाचा स्पर्श कळतो, असे प्रमिला सांगतात.
एखादा आंधळा व्यक्ती जेव्हा रस्त्याने चालतो. तेव्हा तो गाडीचा हॉर्न ऐकून आपली दिशा ठरवतो आणि योग्य मार्गाने जातो. तसच मधमाशांचे असते. त्यांना कोणी आपल्याजवळ येत आहे, असा भास होताच त्या आपला मार्ग बदलतात. त्यामुळे मध काढण्यासाठी त्रास होत नाही. पण, चुकीच्या पद्धतीने मध काढल्यास त्रास हा होणारच, असेही प्रमिला सांगतात.