मुंबई : राज्यात 2022 मध्ये वर्षी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यातील दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना तिकिट दरात 50 टक्के सूट.
महिलासंदर्भातील हा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. यानंतर 17 मार्च 2023 पासून तो संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला. यानंतर आता या योजनेला 17 मार्च 2024 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मागील वर्षभरात किती महिलांनी एसटी प्रवासाचा लाभ घेतला, तसेच एसटीला मागील वर्षभरात या किती उत्पन्न मिळाले, याबाबत न्यूज18 लोकल च्या टीमने विशेष आढावा घेतला.
advertisement
वर्षभरात किती महिलांनी केला एसटी बसमधून प्रवास -
न्यूज18 मराठी लोकलच्या टीमने एसटीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षी 2023 मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. यानंतर ही योजना 17 मार्च 2023 पासून सुरू करण्यात आली. सध्या दररोज सुमारे 55 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यापैकी 18-20 लाख प्रवासी या महिला प्रवासी आहेत.
Sanket Gawhale : विदर्भाचा लाल पुन्हा जाणार रशियात, महिन्याभरात दुसऱ्यांदा आलं निमंत्रण
महिला सन्मान योजना लागू होण्यापूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 8 ते 10 लाख होती. सध्या हीच संख्या 18 ते 20 लाख झाली आहे. त्यामुळे एकूणच एसटीची प्रवासी संख्या वाढली आहे. यासोबतच गेल्या वर्षभरात महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत शासनाने प्रतिपुर्ती रकमेपोटी एसटीला तब्बल 1605 कोटी रुपये अदा केले आहेत.
एसटीला वर्षभरात किती उत्पन्न मिळाले -
मागील वर्षभरात म्हणजे 17 मार्च 2023 ते 16 मार्च 2024 या कालावधीत तब्बल 55 कोटी 99 लाख 57 हजार 161 महिलांनी या योजनेचा लाभ घेत प्रवास केला आहे. तसेच या माध्यमातून 1 हजार 605 कोटींची भर पडली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी एसटीतून 50 टक्के सवलत दरात प्रवास करणारी ही योजना निश्चितच बळ देईल, अशी शासनाची भूमिका आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील नोकरदार महिला, शेतमजूर, छोट-मोठे व्यवसाय करणाऱ्या महिला, भाजी विक्री करणाऱ्या महिलांना या योजनेचा विशेष लाभ झाला आहे. यानंतरही राज्यातील सर्व जेष्ठ नागरिक आणि महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.