नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजपमध्ये अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर आता नाशिकमध्येही उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारीच्या वाटपावर नाराजी व्यक्त करत कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement
गाडीतून एबी फॉर्मची पळवा पळवी
नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची माहिती पसरताच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याची घटना घडली. या वाहनात आमदार राहुल ढिकले आणि सीमा हीरे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून काही नवीन आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही संधी मिळत नसेल, तर मेहनतीचे मोल काय?” असा सवाल अनेक इच्छुकांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात धडक दिली. घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळासाठी परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
या गोंधळात एका इच्छुक महिला उमेदवाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. दिव्या मराठे असे या तरुणीचे नाव असून, पक्षाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आणि उपस्थितांनी तात्काळ हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला. या प्रकारामुळे भाजपमधील असंतोष किती टोकाला पोहोचला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत काही तासांवर येऊन ठेपली असताना, बंडखोरीच्या भीतीने भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर केली नव्हती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटातील युती तुटल्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आणि त्यातूनच असंतोषाचा भडका उडाल्याचे दिसून येते.
“आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, आंदोलनं केली, निवडणुका जिंकून दिल्या. तरीही आज बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते,” असा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केला. या घडामोडींमुळे भाजप नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, अंतर्गत नाराजी आवरणे आणि बंडखोरी टाळणे हे पक्षासाठी कठीण बनले आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील या घटनांमुळे राज्यातील महापालिका निवडणूक आणखीच रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
