मैत्रीच्या प्रवासाचा करुण शेवट
सोमनाथ माणिक पालवे (३२) आणि किरण रामकिसन कारखेले (२७) हे दोघेही त्रिभुवनवाडीचे रहिवासी. लहानपणापासून सावलीसारखे एकमेकांसोबत राहणारे हे दोन मित्र बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास आपल्या दुचाकीने करंजीहून देवराईकडे निघाले होते. मात्र, हॉटेल अपूर्वा समोर समोरून येणाऱ्या एका भरधाव चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला आणि या दोन्ही मित्रांनी जागीच प्राण सोडले.
advertisement
गावाचे आधारस्तंभ हरपले
दोघेही तरुण अतिशय कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचे होते. गावातील कोणत्याही सामाजिक कार्यात सोमनाथ आणि किरण नेहमीच हिरीरीने पुढे असायचे. विशेष म्हणजे, दोघेही अजून अविवाहित होते. आपापल्या घराची जबाबदारी खांद्यावर घेत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या जाण्याने केवळ दोन कुटुंबंच उघड्यावर पडली नाहीत, तर त्रिभुवनवाडीने दोन उमदे आणि मदतीला धावून जाणारे तरुण गमावले आहेत.
मृत्यूपर्यंतची सोबत
"मैत्री असावी तर सोमनाथ आणि किरणसारखी," असं गावात म्हटलं जायचं. नियतीची क्रूरता बघा, ज्या मित्रांनी आयुष्यभर एकमेकांची साथ निभावली, त्यांची साथ मृत्यूनेही सोडली नाही. अपघाताच्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोन्ही मित्रांना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र, या अपघाताने महामार्गावरील सुरक्षिततेचा आणि वेगाच्या मर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
