गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये न्यूक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, तसेच विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर आणि काही अज्ञात कर्मचारी यांचा समावेश आहे. हा गुन्हा अशोक खोकराळे यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आला असून, त्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणे दिसल्याने न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णाच्या मर्जीविरुद्ध जबरदस्तीने अॅडमिट करून घेतल्याचे, त्यांच्या आरोग्यस्थितीची खरी माहिती लपवण्यात आल्याचे आणि जाणीवपूर्वक जास्त प्रमाणात औषधे दिल्याचे आरोप करण्यात आले. तसेच, हॉस्पिटलकडून अवाजवी बिल आकारण्यात आले आणि उपचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता न दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मृतदेहाची परस्पर विल्हेवाट?
सर्वात धक्कादायक म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मृतदेहाचे ठसे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गंभीर आरोपांनंतर तोफखाना पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या मृत्यूची माहितीही दिली नाही, असे तक्रारदार अशोक खोकराळे म्हणाले.
कोरोनाकाळात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण आम्हाला त्याबद्दल योग्य माहिती दिलीच गेली नाही. आम्ही अनेकदा हॉस्पिटलशी संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे अशोक खोकराळे म्हणाले.
या प्रकरणावर डॉक्टर संघटनांनी आक्षेप घेतला आहे. संघटनांनी एकत्र येऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले आहे. हा गुन्हा चुकीचा असून न्यायालयाने कुठलाही आदेश दिला नाही, असा आरोप आयएमए संघटनेने केला आहे. या प्रकरणात डॉक्टरांची चूक नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत असून, वैद्यकीय व्यावसायिकांच्या वागणुकीबद्दल रुग्णांमध्ये प्रचंड अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. कोरोनाकाळातील रुग्णसेवेत अनेकांनी जीवाची बाजी लावली असताना, काहींच्या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय क्षेत्रावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.