अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील वडुले येथे राहणाऱ्या बाबासाहेब सुभाष सरोदे या शेतकऱ्याने सरकारला जबाबदार धरत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून 17 ऑगस्ट रोजी विषारी औषध घेऊन स्वतःच्या शेतात आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वी या शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून कर्जबाजारीपणा बद्दल आणि आपल्या आत्महत्येला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.
advertisement
सरोदे यांनी आत्महत्येपुर्वी बनवलेल्या व्हिडिओत सांगितले,मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे.मी सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर आजपर्यंत जीवंत होतो, कर्जमाफी होऊन मी कर्जमुक्त होईल, या आशेवर मी जगत होतो. दोनदा भाजप सरकार आले, देवेंद्र फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांगून गेले, 'धनवंतानी पिळले, धर्मांधांनी छळले, चोर झाले साव' अशा काव्याप्रमाणे आज सरकार झाले आहे. या सरकारमध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नाही तर इंडस्ट्रियलसाठी आहे. शासनाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. म्हणून मला आत्महत्या करायची वेळ येत आहे. योग्य वेळी सरकारकडून मला मदत झाली असती तर मी नक्कीच आयुष्य पुढे जगलो असतो. परंतू कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियांना मदत व्हावी, अशा आशयाचा व्हिडीओ बाबासाहेब सरोदे यांनी तयार केला होते.
दरम्यान सरोदे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात आई नंदाबाई मृत्यूची सरोदे, पत्नी अर्चना सरोदे, मुलगी किरण सरोदे, मुलगा सुरज सरोदे (वय 17) व रोशन सरोदे (वय 14) भाऊ रविंद्र सरोदे, भाऊजयी असा परिवार आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.