आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर युती आघाड्यांचा निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहे. गडचिरोलीत धर्मराव बाबा आत्राम यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी-भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मला पाडायला भाजपने पाच कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले
माझ्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणी लढले पाहिजे हे माझ्या मतदारसंघात मी ठरवणार. माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केले. मला पाडायला भारतीय जनता पक्षाने पाच कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले, असे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. भाजपला एकही तुकडा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळ चालेल आणि एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही, असे वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेप्रसंगी केले. एकप्रकारे भाजपशी युती न करण्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली.