अजित पवार हे बुधवारी, बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी दाखल होणार होते. मात्र, बारामतीमध्ये विमान लँडिंग करताना भीषण अपघात झाला. धावपट्टीपासून विमान १०० फूट उंचीवर आणि ५० फूट अंतरावर असताना हा भीषण अपघात झाला. यावेळी विमान जमिनीला आदळल्यानंतर स्फोट झाला आणि आगीचा लोळ उठला.
विमान लँडिंगच्या वेळी जेव्हा जमिनीवर आदळले, तेव्हा विमानाचा अक्षरशः गोळा झाला. या भीषण आगीमागे विमानातील इंधनाचा मोठा साठा कारणीभूत असल्याचे उघड झाले असून, बारामती विमानतळावरील सुविधांच्या अभावाने हा अपघात अधिक प्राणघातक ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
विमानात किती टन होतं इंधन?
हे विमान मुंबईहून बारामतीला गेले होते आणि तिथून ते पुन्हा मुंबईला परतणार होते. प्रवासाच्या गणितानुसार, मुंबई ते बारामती प्रवासासाठी साधारण ४०० लिटर इंधन वापरले गेले होते. परतीच्या प्रवासासाठी, आपत्कालीन स्थितीसाठी आणि राखीव साठा मिळून विमानात एकूण १४०० लिटर (१.१२ टन) इंधन शिल्लक होते. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टी सोडून खड्ड्यात आदळताच, या मोठ्या इंधन साठ्यामुळे आगीचा प्रचंड डोंब उसळला. यामुळेच विमानात असलेल्यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
'आयएलएस' (ILS) यंत्रणेचा अभाव नडला
अपघाताचे सर्वात मोठे कारण म्हणजे बारामती विमानतळावर असलेली 'इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम' (ILS) ची उणीव असल्याचे सांगण्यात येते. आयएलएस ही यंत्रणा दाट धुक्यात किंवा खराब हवामानात रेडिओ सिग्नलद्वारे वैमानिकाला धावपट्टीची अचूक दिशा दाखवते.
बारामतीला ही सुविधा नसल्याने वैमानिकाला केवळ स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवून (Manual Landing) विमान उतरवावे लागले. धुक्यामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती आणि सिग्नलची मदत नसल्याने वैमानिकाचा अंदाज चुकला असल्याचे सांगण्यात येते.
भौगोलिक परिस्थिती आणि दृश्यमानता
बारामती विमानतळ परिसरातील टेकड्या आणि पठारी भागामुळे येथे जमिनीलगत धुक्याचे प्रमाण अचानक वाढते. मंगळवारी देखील असंच घडलं. दाट धुक्यात धावपट्टी शोधण्याच्या प्रयत्नात विमान चुकीच्या दिशेला गेले आणि इंधनाचा साठा मोठा असल्याने अपघाताचे रूपांतर भीषण आगीत झाले.
