पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी महायुतीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका आपण एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असा अंदाजही अजित पवारांनी व्यक्त केला. तसंच कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून आमदारावर झालेले आरोप आणि कालच्या जिल्हा नियोजन बैठकीत शरद पवारांना बोलून न दिल्याच्या वादावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
कल्याणीनगरच्या अपघात प्रकरणात आमदार सुनिल टिंगरे यांची तीन ते चार वेळा चौकशी झाली, पण त्यातून काही समोर आलं नाही, त्यामुळे उगाच बदनामी केली जाते. लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात, त्यामुळे जावं लागतं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
कालच्या पुण्याच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत निधी वाटपावरून खोटा नरेटिव्ह सेट केला गेला. म्हणे वडिलधाऱ्यांना बोलू दिलं नाही, हे साफ खोटं आहे. मी फक्त नियम सांगितला. पण लगेच पुन्हा एकदा खोटंनाटं सांगितलं गेलं हे बरोबर नाही, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.
विशाळगडावर जे घडू नये ते घडलं, कोर्टाने आदेश दिले, त्यांना आता मदत केली आहे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जाती-जातीमध्ये सलोखा राहिला पाहिजे, गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. याचसोबत तृतीयपंथीयांना लाडकी बहीण योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मी स्वत: सकारात्मक आहे, पण ही मागणी मी कॅबिनेटसमोर ठेवतो, आता लगेच हो म्हणत नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.
