बीड:राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी विरूद्ध मराठा असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो आहे. मनोज जरांगेंनी आपल्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं आहे. त्याचा पाचवा दिवस आहे. तर दुसरीकडे पुणे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही काढले आहे.तर ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाकेंनी देखील ओबीसी जनआक्रोश यात्रा काढली आहे. हाकेंच्या यात्रेला देखील ओबीसी समाजाचा चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. त्यांनी जरांगेंवर थेट आरोप केले आहेत.
advertisement
जरांगेंचा जनाधार घटला -हाके
मनोज जरांगेंवर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले की, " जनजागृती आंदोलनाला घटता जनाधार लक्षात घेऊन जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले, आणि त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबला. मनोज जरांगे पाटलांना जसा ओबीसी समाज चालत नाही, अगदी त्याचप्रमाणे ब्राम्हण आणि देवेंद्र फडणवीस तरी कसे चालतील? अलीकडे राज्यात ओबीसी जनआक्रोश आंदोलनाचा वाढता पाठिंबा लक्षात घेत राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली आहे." अशा आशयाची टीका केली आहे.
'सरकारने जरांगेंचे लाड पुरवू नयेत'
जरांगे पाटील यांचे हे आरक्षणासंदर्भातले आंदोलन होते, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा प्लान होता असं देखील हाके आणि नवनाथ वाघमारेंनी म्हटलं. "लाडकी बहीण ,लाडका भाऊ, लाडका आंदोलक योजना आहे, लाड कशाचे पुरवायचे हे राज्य सरकारने समजून घ्यावे. लाडक्या आंदोलकामुळे सरकारला तोंडाला काळ फसण्याची वेळ आली, तोंड लपवायची वेळ आली." अशी टीका राज्य सरकारवर लक्ष्मण हाकेंनी देखील केली आहे.
जरांगेंनी जनजागृती यात्रा थांबवली पण उपोषण सुरू:
दुसरीकडे मनोज जरांगेंनी जनजागृती यात्रा मराठवाड्यातच स्थगित केली आहे. असं असलं तरी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण मात्र सुरू ठेवलं आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठ्यांसाठी सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण अशी जरांगेंची प्रमुख मागणी आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर सरकार या मागण्याचा गांभीर्याने विचार करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का, अटक वॉरंट जारी
जरांगेंविरोधात अटक वॉरंट:
मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे हजर राहिले नसल्यामुळे त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. त्यामुळेच पुन्हा राज्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आता ते न्यायालयाच्या आदेशाला ते काय उत्तर देणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.
