नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील त्याच्या 'तृप्तबाला' बंगल्याला लागून असलेल्या स्वाध्याय परिवाराच्या तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरातने चक्क अघोषित ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व बेकायदेशीर प्रकार उजेडात आला असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
४७७ वार भूखंडावर 'वक्रदृष्टी'
'दिव्य मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाने चार वर्षांपूर्वी स्वाध्याय परिवाराला आध्यात्मिक कार्यासाठी ४७७ वार भूखंड दान केला होता. या जागेवर सातबारा उताऱ्यावर तत्त्वज्ञान विद्यापीठाची अधिकृत नोंदही आहे. मात्र, खरात आणि त्याच्या कुटुंबीयांनी या जागेचा वापर जणू काही ती त्यांची खासगी मालमत्ता असल्यासारखा सुरू केला आहे. भावफेरी आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी राखीव असलेल्या या भूखंडाला कुंपण घालून तेथे वृक्षारोपण करण्यात आले होते, ज्याचा गैरफायदा खरातने घेतल्याचे दिसत आहे.
advertisement
स्वाध्याय परिवाराचा संताप, SIT चौकशी होणार?
या प्रकाराबाबत स्वाध्याय परिवारातील ज्येष्ठ सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "ही जागा आमचीच आहे, खरातने कोणाच्या परवानगीने हा बेकायदेशीर ताबा मिळवला? त्याच्यावर कडक पोलीस कारवाई व्हायला हवी," अशी मागणी सदस्यांनी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खरातच्या मालमत्तांची चौकशी करणाऱ्या 'एसआयटी' (SIT) कडे आता या जमिनीच्या गैरव्यवहाराचा तपासही सोपवला जाण्याची शक्यता आहे.
