नेमकं काय घडलं?
वर्ध्याच्या साईनगर परिसरातील श्रीनिवास कॉलनी येथे राहणारे प्रा. चिंतामण कोंगरे यांच्या घरी बुधवारी दुपारी दोन तरुण आले. त्यांनी आपली ओळख किसन ज्ञानेश्वर पर्बत आणि चेतन चव्हाण अशी करून दिली. आपण मुंबई येथील आयकर विभागात अधिकारी असून घराची झडती घ्यायची आहे, असे त्यांनी कोंगरे कुटुंबाला सांगितलं.
बनावट वॉरंट आणि ओळखपत्राचा बनाव
advertisement
हल्लेखोरांनी केवळ तोंडी सांगितलं नाही, तर अधिकृत वाटेल असे 'सर्च वॉरंट' आणि आयकर विभागाचे ओळखपत्रही दाखवले. घरात शिरल्यानंतर त्यांनी झडती घेण्याचा बनाव सुरू केला. मोबाईलवर चित्रीकरण करत त्यांनी कोंगरे यांच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रकमेची मागणी केली. मात्र, त्यांच्या वागण्या-बोलण्यातील संशयास्पद हालचालींमुळे कोंगरे कुटुंबाला शंका आली.
कोंगरे कुटुंबाची समयसूचकता
संशय आल्यावर कोंगरे यांनी घाबरून न जाता ओळखीच्या व्यक्तींमार्फत माहिती घेतली आणि तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही तोतया अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले.
पोलिसांकडून मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दोन्ही आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेली ओळखपत्रे, सर्च वॉरंट आणि इतर कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी ही सर्व सामग्री जप्त केली असून आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वर्ध्यात एकच खळबळ उडाली आहे. हे तरुण केवळ दोनच होते की त्यांच्यासोबत आणखी कुणी सूत्रधार आहे? त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे किती जणांना लुटले आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
