अपघात घडला तरी कसा?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साधारण चारच्या सुमारास पंचवटी चौक–लोखंडी पूल मार्गावर दहा प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा जात होती. मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धाम येथे दर्शनासाठी गेलेल्या महिलांचा हा परतीचा प्रवास होता. आठ जणी रेल्वेने पहाटे शहरात उतरल्या आणि त्यापैकी सात जणी रिक्षातून वाळूजकडे जात होत्या.
advertisement
त्याच वेळी पर्पल कंपनीची एक ट्रॅव्हल्स बस अतिवेगाने समोरून येत होती. बसच्या उजव्या बाजूची डिक्की क्लीनरने उघडीच ठेवली होती आणि जवळपास तीन फूट बाहेर आलेला दरवाजा अंधारात जवळपास अदृष्यच होता. रिक्षाचालकाला ते दिसण्याआधीच दरवाजा वेगाने येत थेट रिक्षेच्या मागील बाजूला घुसला. मागच्या सीटवर बसलेल्या लता राजू परदेशी (47) आणि आशा राजू चव्हाण (40, दोघीही रा. वाळूज) गंभीर जखमी झाल्या आणि जागीच मृत्युमुखी पडल्या. त्यांच्यासोबत बसलेल्या भारती एकनुरे आणि मंगल व्हाणे जखमी झाल्या, तर पुढील व मधल्या सीटवरील इतर महिला थोडक्यात बचावल्या.
धडक एवढी भीषण होती की रिक्षा फरफटत जाऊन पलटी झाली. बसचालकाने दरवाजा घुसल्याचे जाणूनही वाहन पुढे नेल्याचा आरोप आहे. अपघातानंतर चालक आणि क्लीनर पळून जात असतानाच स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेमुळे वाळूज परिसरात शोककळा पसरली. आशा आणि लता या दोघी अतिशय जिवलग मैत्रिणी होत्या. दहा दिवसांपूर्वी एकत्र दर्शनाला गेलेल्या या दोन जीवांचे अंत इतक्या वेदनादायी पद्धतीने होईल, याची कल्पनाही नातेवाइकांना नव्हती. वाळूज स्मशानभूमीत दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लता यांच्या पार्थिवावर अंत्यक्रिया सुरू असताना आशा यांच्या अंत्ययात्रेने तेच स्मशान गाठले—हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.लता यांच्या भावाने छावणी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार बसचालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (29, रा. बिदर, कर्नाटक) आणि क्लीनर राज सुनील बैरागी (20, रा. मध्य प्रदेश) या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी डॉ. विवेक जाधव यांनी दिली.
