आरोपी महिलांची नावे ज्योती राजू गायकवाड (बनावट नाव – ज्योती मिसाळ, रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर), माया मधुकर शिंदे आणि सविता मधुकर शिंदे (दोघी रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) अशी आहेत. फिर्यादी हे नाशिक जिल्ह्यातील असून ते पत्नी व दोन मुलांसह शेती करून उदरनिर्वाह करतात.
त्यांचा मुलगा दीपक (नाव बदललेले) यासाठी योग्य मुलगी शोधण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांच्या शेतात काम करणाऱ्या सीमाने ओळखीतील मुलगी सुचवली. फोटो आणि माहिती पाहून मुलगी पसंत आल्याने कुटुंब 23 सप्टेंबर रोजी सिडको परिसरातील ज्योती गायकवाड हिच्या घरी गेले. तिथे ज्योती, रेखा मिसाळ आणि माया शिंदे उपस्थित होत्या. आरोपींनी मुलीच्या आईच्या आजारपणाचा मुद्दा काढत, उपचार आणि दागिन्यांसाठी 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली.कोर्ट मॅरेजद्वारे लग्न करण्याचे ठरवण्यात आले. आरोपींनी वकिलाला पाच हजार रुपये पाठवायला सांगितले. त्यानंतर रोख, फोनपे आणि मित्रामार्फत एकूण 3.86 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने अशा स्वरूपात शेतकऱ्यांनी रक्कम दिली.
advertisement
24 सप्टेंबर रोजी सर्व मंडळी कोर्ट मॅरेजसाठी जिल्हा न्यायालयात पोहोचली. तलवार नावाच्या वकिलाने कागदपत्रे घेतली आणि फी म्हणून 12 हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलगी माया हिच्यासोबत सर्वजण गावाकडे निघाले, मात्र काही अंतरावरच ती एका स्कॉर्पिओ गाडीत बसून फरार झाली.घटनेनंतर बदनामीच्या भीतीने शेतकऱ्याने सुरुवातीला मौन बाळगले. काही दिवसांनंतर हीच टोळी कोपरगावात पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ओळख पटवली आणि तक्रार नोंदवली.
सिडको पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता, पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.