१२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या रात्री वांद्रे (पूर्व) येथे तत्कालीन आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली असून, बिश्नोई टोळीच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या ही अभिनेता सलमान खानसोबत असलेल्या जवळीकीमुळेच बिष्णोई टोळीने केली असल्याची चर्चा होती. तर, सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात बिल्डर लॉबीवरही संशय व्यक्त केला होता.
advertisement
मुंबई पोलिसांनी काय म्हटले?
पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले की, ही हत्या अनमोल बिश्नोईच्या टोळीने केली आहे. दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी विश्वात वर्चस्व प्रस्थापित करणे आणि खंडणी वसूल करणे हाच या हत्येमागचा मुख्य उद्देश होता.
तपासादरम्यान कोणत्याही बिल्डरचा किंवा विकासकाचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील (SRA) वादातून ही हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तपास 'अपूर्ण' असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सहाय्यक पोलीस आयुक्त (सीआयडी) किशोरकुमार शिंदे यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.
पत्नीचे आरोप पोलिसांनी फेटाळले, 'यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्यासाठी...'
शहझीन सिद्दीकी यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला होता की, वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये रस असलेल्या काही 'वजनदार' बिल्डरांची चौकशी पोलिसांनी केलेली नाही. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप 'तथ्यहीन' असल्याचे म्हटले आहे.'पोलिस यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. संपूर्ण तपास हा तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने करण्यात आला आहे," असे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
