अमरावती शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा माजी शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय. वर्ध्यात विनाअनुदानित शाळा शिक्षकांच्या समस्यांसाठी आयोजित मेळाव्याला आले असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मी उभे राहावे असे शिक्षकांची इच्छा, मी देखील तयारी करतोय, पण....
अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढावी अशी अनेक शिक्षकांची इच्छा आहे. माझ्यासाठी शिक्षक संघटनांचा आग्रह आहे, परंतु उभं राहण्यापूर्वी सर्व मतदार शिक्षकांच्या घरोघरी जाऊन त्यांना विचारणार आहोत की, उभं राहू की नको. कारण माझा कुणी नेता नाही आणि आमचा कोणता मोठा पक्षही नाही. शिक्षकच आमचा नेता आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
advertisement
जुलै महिन्यात शिक्षक निवडणुकीचा अंतिम निर्णय घेईन
शिक्षकांची मते जाणून घेतल्यावरच जुलै महिन्यात निवडणुकीला उभे राहायचे की नाही ते आम्ही ठरवू. शिक्षण ही काळाची गरज आहे, शिक्षण गरीबापासून दूर जाता कामा नये. त्यामुळे मी सध्या शिक्षक संघटना बांधतो आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
चार वेळा अचलपूरचा गड राखला होता, पण पाचव्या वेळी अपयश
सलग चार वेळा बच्चू कडू यांनी अचलपूरचा गड राखला होता. यंदा त्यांची पाचवी वेळ होती. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्यात त्यांना अपयश आले. आम्हाला काही ठिकाणी संशयास्पद आकडेवारी वाटत आहे. भाजपला ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला काय अडचण आहे, असे निकालानंतर बच्चू कडू म्हणाले होते.