पोलिसांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आगामी काळातील आपले इरादे स्पष्ट केले. कट रचणे हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत. कोणाचा जीव घेणारे लोक नाहीत, असे सांगतानाच आपल्या बदनामीसाठी हा गुन्हा दाखल केला गेल्याचा आरोप त्यांनी केला.
जर आवाज दाबत असाल....
बच्चू कडू म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी हा कट रट रचला गेला आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर दीड लाख रूपये मिळावे यासाठी आता मी आंदोलन करणार होतो. बच्चू कडूला बदनाम करून अटक करण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही स्वतःहून अटक होऊ. प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून आम्ही अटक करून घेऊ.
advertisement
सत्ता तुमची, जिल्ह्याचा एसपी तुमचा, फॉरेन्सिक लॅबही तुमची
मी उद्यापासून एवरेस्ट बेस कॅम्पला चाललो आहे. बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन पुढील लढा लढणार आहे. देवाचीच अवकृपा झाली तर आम्ही काय करणार? सत्ता तुमची, जिल्ह्याचा एसपी तुमचा, फॉरेन्सिक लॅब तुमची, असे बच्चू कडू म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
आमदार प्रवीण तायडे आणि अभिजीत तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार प्रवीण तायडे यांना राजकारणात कमकुवत करण्यासाठी बच्चू कडू यांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांनी आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजीत तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हत्येच्या कटाशी संबंधित संभाषणाची मोबाईल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून पोलीसांकडे सादर करण्यात आली असून ती तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे. पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करत आहेत.
