दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल आज वाजलं. त्यासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
advertisement
बारामतीची निवडणूक बिनविरोध
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. यानंतर त्यांना सहा महिन्यांत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीमधून पोटनिवडणूक लढणार, हे जवळपास निश्चित आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार हे राज्यसभेवर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब झाले होते.
राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार का?
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते. तेव्हापासून राहुरी विधानसभेची जागा रिक्त आहे. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीत भाजप राहुरी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल. तसेच राहुरीची देखील निवडणूनक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे.
