टेम्पोचा अहवाल आरटीओकडून सादर
ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी दोन उड्डाणपूल एकत्र जोडले गेलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचते. हे पाणी अचानक वाहनाच्या काचेवर उडाल्याने अपघाताचा धोका वाढतो. तसेच या उड्डाणपुलावर असलेल्या रस्त्याच्या दुभाजकाची उंची देखील कमी आहे. त्यामुळे दुभाजकावरून कोणीही दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करू शकते, त्यामुळे यात सुधारणा करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे.
advertisement
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर पाणी साचते. त्यामुळे कार दुभाजकावर धडकली होती. याच कारला बाजूला काढण्यासाठी सहा तरुण गेले होते. त्याच वेळी आयशर टेम्पोने सहा जणांना भरधाव वेगाने चिरडले, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला.
महामार्गावर टेम्पोला ८० किलोमीटर वेगाची मर्यादा आहे. मात्र पुलावर उतार असल्याने टेम्पोचा वेग शंभर होता. उतारावर पाणी साचल्याने टेम्पो चालकाला टेम्पोवर नियंत्रण मिळवणे कठीण गेले. पावसामुळे दृश्यमानता कमी होती आणि त्याचवेळी टेम्पो चालकाने या सहा जणांना धडक दिली, असे म्हणणे आरटीओ अधिकाऱ्यांनी मांडले आहे.
अपघातात सहा जण जागीच गेले
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर 26 मे रोजी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
गेवराईनजीक असणाऱ्या गढी पुलावर एसयूव्ही कार दुभाजकाला धडकल्याने किरकोळ अपघात झाला. दुभाजकापासून गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले मात्र पुढच्या काही मिनिटांत रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने सहा जणांना जोरदार धडक दिली. यात सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
