मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) 'तटस्थ' राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना मनसेच्या या भूमिकेमुळे पालिकेतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराजी...
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेच्या या नाराजीमागे 'स्वीकृत नगरसेवक' पदाचा मुद्दा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ३ स्वीकृत नगरसेवक नियुक्त झाले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात या तीन जागांपैकी एक जागा मनसेला मिळावी, अशी राज ठाकरे यांच्या पक्षाची अपेक्षा होती. मात्र, तिथे डावलले गेल्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता होती.
advertisement
स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यास त्याची भरपाई म्हणून काही प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मनसेला दिले जाईल, असे आश्वासन ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता, प्रभाग समिती निवडणुकीत मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरे गट-महाविकास आघाडीला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. प्रभाग समिती या स्थानिक पातळीवर निधी वाटपाचा निर्णय घेतात. त्यामुळे महापालिकेतील सत्तेशिवाय प्रभाग समितीवर वर्चस्वासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू असते. अशातच आता स्थानिक पातळीवरील सत्तेपासूनही ठाकरे गटाला मनसेमुळे वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे.
