विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सृष्टी विकास मते, श्रृती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
पाच वर्षांचे प्रेमसंबंध; नंतर नकार
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विक्रम आणि आरोपी सृष्टी मते यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवून नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण देत तिने लग्नास नकार दिला. २७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रृती यांनी विक्रमला सतत फोन करून मानसिक त्रास देणं आणि ब्लॅकमेल करणं सुरू केलं.
पुण्यात बोलावून धमकी
५ जानेवारी रोजी विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आले. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी सृष्टीचे वडील विकास मते यांनीही विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप आहे.
सुसाईड नोटमध्ये छळाचा उल्लेख
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७:४५ दरम्यान विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असा उल्लेख आहे. चिठ्ठीत आरोपींकडून झालेल्या छळाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी सुसाईड नोट, कॉल रेकॉर्ड व मोबाईल डेटा तपासासाठी मोबाईल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
