सौर कृषी पंपात बिघाड झाला तर तक्रार कुठे अन् कशी करायची?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Saur Krushi Pump Yojana : ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत सौर कृषीपंप घेताना किंवा वापरताना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
मुंबई : ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत सौर कृषीपंप घेताना किंवा वापरताना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणने महत्त्वाची पावले उचलली आहेत. यापुढे शेतकऱ्यांना तक्रारींसाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या, मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून एका क्लिकवर तक्रार नोंदवता येणार असून, त्या तक्रारीचा थेट मागोवाही घेता येणार आहे.
ऑनलाइन अडचणी सोडवा
राज्यात अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषीपंपासाठी अर्ज करून आवश्यक रक्कम भरली आहे. मात्र काही ठिकाणी पंप बसवण्यात विलंब होत असल्याच्या, तर काही ठिकाणी बसवलेले पंप सुरू न होणे, वीजनिर्मितीत अडचणी येणे किंवा तांत्रिक बिघाड होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा सर्व अडचणी लक्षात घेऊन महावितरणने स्वतंत्र ‘तक्रार निवारण पोर्टल’ सुरू केले आहे. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर तक्रार कोणत्या टप्प्यावर आहे, तिच्यावर काय कार्यवाही सुरू आहे, याची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळणार आहे.
advertisement
तक्रार नोंदवण्याची सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया
तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) भेट द्यायची आहे. संकेतस्थळाच्या होमपेजवर ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ हा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर लाभार्थी क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा जिल्हा, तालुका, गाव व लाभार्थ्याचे नाव यापैकी कोणतीही माहिती टाकून संबंधित अर्ज शोधता येतो.
advertisement
यानंतर शेतकरी आपली समस्या सविस्तरपणे लिहू शकतात. पंप बसवण्यात झालेला विलंब, उपकरण बिघाड, देखभाल दुरुस्ती, सेवा न मिळणे अशा कोणत्याही स्वरूपाची तक्रार येथे नोंदवता येते. एकदा तक्रार दाखल केल्यानंतर तिचा संदर्भ क्रमांक मिळतो, ज्याच्या आधारे पुढील स्थितीचा आढावा घेणे सोपे होते.
कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरजच नाही
याआधी तक्रारींसाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालय, कंत्राटदार किंवा संबंधित विभागाकडे वारंवार जावे लागत होते. वेळ, पैसा आणि श्रम खर्च होऊनही अनेकदा समस्या प्रलंबित राहत होती. नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
शेतकऱ्यांना महावितरणचे वारंवार आवाहन
महावितरणने शेतकरी बांधवांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत ऑनलाइन सुविधेचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. सौर कृषीपंपाशी संबंधित कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास त्वरित पोर्टलवर तक्रार नोंदवावी, जेणेकरून ती वेळेत सोडवता येईल. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचा लाभ घेऊन दिवसा सिंचन, कमी खर्च आणि शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून आपली शेती अधिक समृद्ध करावी, असेही महावितरणकडून वारंवार सांगण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 9:09 AM IST








