बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदजवळ एका कारने पायी चालणाऱ्या 3 जणांना उडवलं आहे. यात तिन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या महिला शेतातून काम करून घराकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतले गेले आहेत
advertisement
सूत गिरणीजवळील टर्निंगवर हा अपघात घडला. यात भरधाव कारची धडक इतकी जबर होती, की तिघींचाही जागीच मृत्यू झाला. यात मायलेकीसह एका वृद्ध महिलेनं आपला जीव गमावला आहे. जळगाव जामोद शहरात हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या महिला शेतात कामासाठी गेल्या होत्या. यानंतर शेतातील कामं आटोपल्यावर घरी जाताना त्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. इतक्यात एक भरधाव कारने त्यांना चिरडलं.
अमरावतीमध्येही भीषण अपघात -
अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. या अपघातात सहाय्यक पोलीस अधिकारी प्रियंका कोटावार यांचा डावा पाय निकामी झाला. हा अपघात इतका भयानक होता की पायाचा चुरा झाला. घटनेनंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महिला पोलीस अधिकारी प्रिंयका कोतावार ह्या आपल्या कर्तव्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात जात असताना हा अपघात घडला. अमरावती शहरात गौण खनिजांच्या ट्रकची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. या घटनेनंतर या अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला .
