भयंकर हत्याकांड आणि पोलिसांची निष्क्रियता?
महिनाभराच्या शोधानंतर, लोणार पोलीस स्टेशनपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर अशोक सोनुने यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. या मृतदेहाला हात, पाय आणि मुंडके नसल्याने या हत्येचे क्रौर्य अधोरेखित होते. ही हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने केल्याचे स्पष्ट होत आहे.
आठ वेळा तक्रार दिली पण...
advertisement
सोनुने यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात पोलिसांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'माझ्या जीवाला धोका आहे' अशी तक्रार सोनुने यांनी गेल्या एका वर्षात आठ वेळा पोलीस ठाण्यात दिली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच, सोनुने बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तीन वेळा पोलीस स्टेशनला धाव घेतली होती. असे असतानाही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप केला जात आहे.
वंजारा समाजाचा वाली नाही का?
घटनेला महिना उलटूनही या प्रकरणातील एक मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. किरकोळ जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. वंजारी समाजातून आणि सोनुने यांच्या कुटुंबीयांकडून 'गरीब वंजारा समाजाचा वाली कुणीच नाही का?', 'विधानभवनात कोण बोलणार?' असे प्रश्न विचारले जात आहेत.
"CID मार्फत चौकशी करावी"
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या गांभीर्यामुळे, बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या प्रकरणात गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेऊन यात विशेष तपास पथक (SIT) किंवा गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध केला असून गरीब वंजारी समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा देखील दिला आहे.
विशेषतः पोलिसांच्या भूमिकेमुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ६० वर्षीय सोनुने यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या आठ तक्रारी दिल्या असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, आणि 8 मे रोजी पोलीस ठाण्यात मध्यस्थीसाठी बोलावल्यानंतरच त्यांचे अपहरण झाले. कुटुंबीयांनी सोनुने बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यावरही पोलिसांनी योग्य तपास केला नाही, आणि अखेर 11 जून रोजी लोणार पोलीस स्टेशनजवळच त्यांचा अर्धवट मृतदेह सापडला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असली तरी, एक आरोपी अजूनही फरार आहे, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.