चिखली तालुक्यातील गुंजाळा गावातील ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. संतोष केदार या तरुण शेतकऱ्याने गावालगतच्या शेतामध्ये एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कर्जाचा डोंगर आणि सोयाबीनची नासाडी
संतोष केदार यांच्याकडे पाच एकर शेती होती. शेतीत पेरणी आणि इतर कामांसाठी त्यांनी ३ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते होते. काही दिवसांपूर्वी चिखली तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसात संतोष यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. पाण्यामुळे संपूर्ण पिकाची नासाडी झाली. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला.
advertisement
कर्जाची परतफेड करण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिला नाही. आता कर्जाचा डोंगर कसा फेडायचा? या विवंचनेत त्यांनी हे अत्यंत कठोर पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.