मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक प्रवासी भाडे घेऊन राजुरा शहराकडून खामोना-पाचगाव येथे जात होता, तर त्याच दरम्यान ट्रकचालक हा गडचांदूर येथून राजुऱ्याकडे येत होता. यावेळी कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवे वर रिक्षा चढताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला होता.
advertisement
या अपघातात रिक्षा चालक प्रकाश मेश्राम याच्यासह 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.चालक प्रकाश मेश्राम (48, पाचगाव), रवींद्र बोबडे (48, पाचगाव), शंकर पिपरे (50, कोची), वर्षा मांदाडे (50, खामोना), तनु पिंपळकर (16, पाचगाव) आणि ताराबाई पप्पूलवार (50, पाचगाव) यांचा समावेश आहे.अशी या सहा मृतांची नावे आहेत. तर या अपघातात 3 जण गंभीररित्या तर 1 किरकोळ जखमी आहेत.
ही घटना ज्या महामार्गावर घडली त्याच महामार्गावरून राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे प्रवास करत होते.त्यामुळे त्यांनी तत्काळ अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध करून दिली. गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे तर एक प्रवासी राजुरा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातून एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही घटना घडली.
या अपघातात निलेश वैद्य (32 वर्ष) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (26 वर्ष) आणि मुलगी मधू वैद्य (3 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे बल्लारपूर येथून आपल्या घरी परत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला असून राजुरा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. इथून कोळसा वाहतूक होत असल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.