एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करीत राज्यात पाइपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) नेटवर्कचा विस्तार अधिक वेगाने व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आखाती देशांमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा प्रचंड तुटवडा झाला आहे. अनेक शहरात एलपीजीसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाची भूमिका मांडली.
advertisement
गॅसचा मुबलक साठा, काळजीचे कारण नाही, लॉकडाऊन वगैरे काहीही लागणार नाही
भुजबळ म्हणाले, युद्धाचा परिणाम संपूर्ण फक्त आपल्याकडे नाही तर जगभरात होत आहे. इंधनाची कमतरता होऊ नये यासाठी पंतप्रधान आणि त्यांचे अधिकाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढत सगळेकडे प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी चाळीसहून अधिक देशांसोबत बोलणी केली आहे. सुदैवाने हार्मोजच्या खाडीतून सुद्धा आपल्या जहाजांना विशेष परवानगी दिली जात आहे. अश्यात अफवांचे पीक सुद्धा वाढले आहे. हे बंद होणार, ते बंद होणार, असे सांगितले जात आहे. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सांगितले की आपल्याकडे घरगुती गॅसचा मुबलक पुरवठा आहे. आपण पुरवठा वाढवावा म्हणून प्रयत्न करत आहोत. कोणतीही लॉकडाऊन होणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
...तर तुमचा LPG बंद होऊ शकतो, छगन भुजबळांची महत्त्वाची सूचना
अनेकांनी पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) घेतले नाही. जिथे पीएनजी मिळविण्याची सोय आहे तिथेही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ३ महिन्याच्या आत सगळ्यांनी पीएनजी सुरू करायचा आहे. ज्यांना पीएनजी हवा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. संबंधित कंपन्यांना शहरातील भाग वाटून दिले आहेत. मुंबई- ठाणे-नवी मुंबई इथे महानगर गॅस आहे. अशा प्रकारे विविध कंपन्यांना भाग दिले आहेत. लोकांना अर्ज कुठे द्यावे हे कळत नाही. त्यांनी तो आमच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावा. मला पीएनजी हवा आहे, असे अर्जात नमूद करून पत्त्यासह पुरवठा विभागाकडे अर्ज द्या. अधिकाऱ्यांनी ते अर्ज त्वरेने गॅस एजन्सीकडे जमा करावेत, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. तसेच शक्य असूनही पीएनजी गॅस घेतला नाही तर LPG बंद होऊ शकतो, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. जर तुम्ही अर्ज केला असेल आणि काही कारणांनी तुमच्याकडे पीएनजी कनेक्शन आले नाही तर समजू शकतो. पण तुम्ही अर्जही केला नसेल तर मात्र तुमचा एलपीजी बंद होऊ शकतो, असे भुजबळ म्हणाले.
बाकी ठिकाणी एलपीजी पुरवठा सुरू राहील
पीएनजीचा निर्णय सगळ्यांसाठी नाही. जिथे पीएनजीची सोय आहे तिकडे हे लागू होईल. बाकी ठिकाणी एलपीजी पुरवठा सुरू राहील, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. अन्न धान्य पुरेसे आहे. रेशनिंगवरचे अन्न धान्य तुम्ही ३ महिन्याचे घ्यावे, असे मी सुचित करतो. आताच्या परिस्थितीत आपण जो केरोसीनचा कोटा देत आहोत. ज्यांना केरोसीन हवे आहे त्यांनी तो घ्यावा, असेही भुजबळ यांनी सांगितले.
लोकांच्या रांगा का लागल्या आहेत?
एलपीजी, केरोसिनसाठी लोकांच्या रांगा का लागतात? असे अनेक जण विचारत आहेत. लोक लॉकडाऊनच्या भीतीमुळे २-३ सिलेंडर घेत आहे, असे भुजबळ म्हणाले.
