मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील मुकीद शेख आणि त्यांच्या पत्नी निलोफर शेख हे सोमवारी रात्री रमजानचा रोजा सोडून इसारवाडीकडे कारने निघाले होते. मार्गात त्यांनी हदगाव (ता. शेवगाव) येथून नातेवाईक अल्ताफ पठाण यांना सोबत घेतले. रात्री साडेअकराच्या सुमारास चांगतपुरी शिवारात रस्ता चुकल्याने चालकाने वाहन रिव्हर्स घेत असताना नियंत्रण सुटले आणि कार थेट कालव्याच्या खोल पाण्यात कोसळली.
advertisement
भावासोबत असं कोण वागतं? आईवडिलांचं निधन, प्रॉपर्टीसाठी बहिणींचं भयंकर कांड
अपघातानंतर अल्ताफ पठाण यांनी पोहत बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र शेख दाम्पत्य आणि त्यांना वाचवण्यासाठी तत्काळ कालव्यात उडी घेणारे रावसाहेब खडेकर हे तिघेही प्रचंड प्रवाहात वाहून गेले. त्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
बुधवारी सकाळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुळज परिसरात एक शेतकरी कालव्यावर मोटार सुरू करण्यासाठी गेला असता मोटारीच्या हुकाला एक मृतदेह अडकलेला दिसला. पोलिसांनी तो बाहेर काढल्यानंतर तो निलोफर शेख यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खांडपिंपरी-बोरगाव शिवारातील पिंगेवाडी जवळील उजव्या कालव्यात आणखी एक मृतदेह स्थानिक शेतकऱ्यांना आढळला. तो परोपकारी वृत्तीचे रावसाहेब गणपत खडेकर यांचा असल्याची ओळख पटली. रात्री उशिरा सुरू असलेल्या शोधकार्यात अग्निशमन दलाच्या पथकाला मुकीद अहमद शेख यांचा मृतदेहही हाती लागला.
मुकीद आणि निलोफर शेख यांनी आपल्या 12 वर्षांच्या मुलीला आणि 8 वर्षांच्या मुलाला चुलत्याकडे ठेवून हा प्रवास सुरू केला होता. मात्र नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातला. संपूर्ण शोधकार्यात पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आणि उपनिरीक्षक प्रमोद यादव यांनी देखरेख केली. तिघांचेही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






