लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर या पुरस्कार सोहळ्यात आमिर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत घेतली. मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास, पर्यावरणाचा प्रश्न, वातावरणीय बदल, कृत्रिम बुद्धिमता, शिक्षण क्षेत्रात नव्याने आणावयाच्या गोष्टी, बोकाळलेला भ्रष्टाचार,भारतीय राजकारणातील निवडणूक सुधारणा आदी विषयांवर आमिरने विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
आमिरच्या प्रश्नावर CM फडणवीसांनी आमदारांना फटकारलं
advertisement
आपल्याकडे इलेक्टोरल रिफॉर्म्स का होत नाहीत? या आमिर खान यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत हा अतिशय मोठा देश आहे. घटनाकारांनी भारतात 'फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम' (First Past the Post System - FPTP) प्रणाली अतिशय विचार करून निवडली. देशात असलेली विविधता, शिक्षणाचं प्रमाण आदी गोष्टी लक्षात घेऊन घटनाकारांनी निवडणूक प्रणाली आपल्याला दिली.
तरीही आमिर खान यांनी अमुक देशात अमुक निवडणूक प्रणाली असल्याचे सांगितल्यावर फडणवीस यांनी मजेदार किस्सा सांगितला. "अमेरिकेसारखे प्राधान्य क्रमाने मतदानाचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, तसे मतदान आपल्याकडे विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीला होते. अनेक शिकलेल्या आमदारांना तसे मतदान करता येत नाही. २८८ आमदारांपैकी अनेकांचे मतदान बाद होते. पसंती क्रमाने मतदान कसे करायचे हे अजूनपर्यंत आमदारांनाही समजत नाही."
फडणवीसांनी आमदारांची शाळा घेतलेली पाहून उपस्थित आमदार, मंत्री, आणि प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी हास्यसागरात बुडाले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेही हास्य बरेच काही सांगून जाणारे होते.
अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांचे आनंदी जीवन महत्त्वाचे नाही का?
फडणवीस यांच्या बोलण्यात अनेकदा भारताची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती वेगाने पुढे जाते आहे, याचा उल्लेख आल्यावर आमिर खान यांनी हॅपिनेस इंडेक्सवर विचारले. अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांचे आनंदी जीवन महत्त्वाचे नाही का? असे आमिरने विचारल्यावर फडणवीस यांनी सर्वसामान्यांसाठी केंद्राच्या योजना सांगायला सुरुवात केली.
