राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आपण बारामतीला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित दादांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, प्रश्नांची जाण असलेला नेता होता. अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजितदादा अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं असं व्यक्तिमत्व असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
हा महाराष्ट्रासाठी हा कठीण दिवस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्या वेळी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असताना अशा काळात त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनिय मनाला चटका लावणारं आहे. माझ्याकरता वैयक्तिक दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची भावना आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात असल्याचे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हटले की, मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. सकाळपासून मी सर्वांच्या संपर्कात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शाह यांना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. त्यांनाही या घटनेची माहिती मिळताच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पुढच्या गोष्टी या कुटुंबियांशी चर्चा करून ठरवण्यात येतील. एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढचे सगळे निर्णय त्यांच्या संमतीने घेतले जातील असेही त्यांनी म्हटले.
