बुलडाणा जिल्ह्यात कुणी-कुणी राजीनामे दिले?
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यानंतर आता काँग्रेसचे शेगाव तालुका अध्यक्ष विजय काटोले, खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे आणि खामगाव शहराध्यक्ष सरस्वती ताई खाचणे यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सानंदा हे 12 जून रोजी 25 हजार कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
advertisement
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना धक्का देऊन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आपल्या मनगटावर घड्याळ बांधतील.
स्वच्छ प्रतिमेच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्याच्या काँग्रेसची सूत्रे
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार यशानंतर विधानसभेतही काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असे पक्षनेतृत्वाला वाटत होते. मात्र पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे पक्षाला जबर धक्का बसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातही पक्षातील काही नेते नाराज होते. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यपदाच्या निवडीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू होत्या. आक्रमक नेते सतेज पाटील, विलासराव देशमुखांचे सुपुत्र अमित देशमुख यांचीही नावे प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत होती. परंतु पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर अधिक विश्वास दाखवला.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बड्या नेत्यांना बाजूला सारून काँग्रेसने अतिशय स्वच्छ प्रतिमेच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व दिले आहे. एरवी सहकारसम्राट किंवा शिक्षणसम्राट नेत्याकडे काँग्रेसची सूत्रे असायची. सहकार चळवळीतील नेत्याकडे पक्षाची सूत्रे असतील असेल तर अधिकाधिक लोकापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार रुजवता येईल, अशी पक्षाची धारणा होती. पण यंदा ठरवून पक्षाने साखर सम्राट आणि शिक्षणसम्राट नेत्यांवर फुली मारून महाराष्ट्राच्या संघटनेची जबाबदारी कोणताही डाग नसलेले आणि कोणतीही भीडभाड न ठेवता सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे नेतृत्व म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षाच्या अध्यक्षपदी संधी दिली.
