याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर टोल नाक्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. मिरारोडच्या दिशेने जाणारा आणि मुंबईच्या दिशेने येणारा अशा दोन्ही मार्गांवर नेहमी वाहनांच्या रांगा असतात. त्यामुळे मिरा-भाईंदरसह वसई, विरार, पालघर, गुजरात आणि अन्य राज्यांतून येणाऱ्यांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे हा टोल नाका स्थलांतरित करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनीही हा टोलनाका स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.
advertisement
प्रताप सरनाईक यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले होते. 11 सप्टेंबर रोजी सरनाईक, एमएसआरडीसी, एनएचएआय आणि स्थानिक पोलिसांनी हा टोलनाका कुठे स्थलांतरित करता येईल, याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर एमएसआरडीसीने अहवाल सादर केला.
या अहवालाच्या आधारे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदाल यांनी एनएचआयच्या अध्यक्षांकडे त्यांच्या ताब्यात असणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाआधी टोलनाका स्थलांतरित करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे जवळच्या शहरी भागातील वाहतुकीचा ताण नाक्यावर येणार नाही, असं या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. या मार्गावर फास्ट टॅगसह इतर तंत्रज्ञानाचा वापर करून टोलनाक्यावर होणारी कोंडी टाळता येईल, असंही एमएसआरडीसीने प्रस्तावात स्पष्ट केलं आहे.
याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली आहे. टोलनाका स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे निर्देश 'एनएचएआय'ला द्यावेत, अशी विनंती सरनाईक यांनी केली.