धाराशिवची लढत नात्यागोत्याच्या लढाईमुळे रंजक ठरली. ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं अर्चना पाटील यांना महायुतीकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळाली. अर्चना पाटील यांनी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना आव्हान दिलं. मतदारसंघात असलेला ओमराजेंचा जनसंपर्क, सामान्य लोकांशी असलेली नाळ याच्या विरोधात अर्चना पाटील यांच्याकडून आव्हान देण्याचा प्रयत्न या लोकसभा निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
अर्चना पाटील यांच्या बाजूने शिवसेना नेते तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, अर्चना पाटील यांचे पती भाजप आमदार राणा पाटील, आमदार अभिमन्यू पवार, बार्शीचे भाजप आमदार राजा राऊत, माजी आमदार बसवराज पाटील या मातब्बर नेत्यांनी मोठं बळ उभा केलं होतं. त्यातल्या त्यात तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात रंगलेल्या शाब्दिक युद्धाने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. ओमराजे निंबाळकरांचा असलेला जनसंपर्क, फोनवर लोकांच्या संपर्कात राहणे या गोष्टी चर्चिल्या गेल्या. एकीकडे सगळे मातब्बर नेते असताना लोकांशी कायम संपर्कात राहणे, फोन उचलणे या गोष्टी शेवटपर्यंत ओमराजे निंबाळकरांनी प्रचारात आपल्या पथ्थ्यावर पाडून घेतल्या. त्यांचा धाराशिवमधून मोठा मताधिक्यानं विजय झाला आहे.