राजन साळवी हे जुन्या शिवसैनिकांपैकी एक आहेत. एकसंध शिेवसेनेकडून त्यांनी तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. जवळपास 3 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर वेगळी चूल मांडली. त्यावेळीही राजन साळवी यांनी ठाकरेंना साथ दिली. या दरम्यान, साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात एसीबीकडून चौकशीचा ससेमिरा लागला होता. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाच्या किरण सामंत यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
advertisement
एकनाथ शिंदे यांचा पहिला निशाणा कोणावर?
राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिला धक्का हा स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांना दिला. कोकणात उद्धव ठाकरे यांच्याकडे मोजकेच शिलेदार राहिले आहेत. ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोठं भगदाड पाडले आहे. साळवी यांना आणखी बळ देत शिंदे यांच्याकडून रत्नागिरीत आपला पक्ष आणखी भक्कम करण्यासाठीची रणनीती असणार आहे.
दुसरा निशाणा कोणावर?
राजन साळवी यांना पक्षात प्रवेश देत एकनाथ शिंदे यांनी पक्षातंर्गत बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा आहे. उदय सामंत यांना पक्षातील काही आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील शिवसेनेचे आमदार आहेत. सामंत बंधूंना रत्नागिरीत रोखण्यासाठी एकनााथ शिंदे यांनी ही खेळी खेळली असल्याचे म्हटले जात आहे. साळवी यांना पक्षात घेऊन सामंतांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा रंगली आहे.
संघटनाबांधणीत साळवींचे योगदान...
रत्नागिरीत शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत राजन साळवी यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सामान्य शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख ते आमदार अशा विविध पदांवर साळवी यांनी काम केले आहे. त्यामुळे साळवी यांचा संपर्क अधिक चांगला आहे. त्याचा फायदा शिंदे यांच्या गटाला होणार असल्याचे म्हटले जात आहे.
