मुंबई महानगरपालिका निवडणुका पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच पक्षांनी आपल्या तयारीला वेग दिला आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत तब्बल १०० ते १२५ वॉर्डमध्ये उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. परंतु भाजपकडून या मागणीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना (शिंदे) गटासाठी ही बीएमसी निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. कारण शिवसेना फुटल्यानंतर ही त्यांची पहिलीच महानगरपालिका लढाई असेल. फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाकडील मागील टर्ममधील ४६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि इतर पक्षांतील काही माजी नगरसेवक व नेतेही शिंदे गटात सामिल झाले आहेत. शिंदे गटाकडे मुंबईतील जवळपास १२५ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनी किमान इतक्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
advertisement
भाजपकडून किती जागांची ऑफर?
यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा पाडाव करून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने मुंबईच्या महापौरपदी आपलाच नगरसेवक बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने २२७ जागा स्वबळावर लढल्यास १५० जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प सोडला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने १०० ते १२५ जागांची मागणी केली आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला केवळ ७० जागा देण्यास तयार आहे. शिंदेना १०० जागा सोडता येणार नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे शिंदे गटाने एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “१०० प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणे हा आमचा ठरलेला निर्णय आहे. आमच्याकडे पुरेसे नेतृत्व, पुरेसे कार्यकर्ते आणि मजबूत संघटनात्मक ताकद आहे.”
बीएमसी निवडणुकीत महायुतीचे समीकरण कसे बसते, भाजप किती जागा सोडतो आणि शिंदे गट किती कणखर भूमिका घेतो, यावर या निवडणुकीचे राजकीय चित्र ठरणार आहे.
