दिल्लीत विविध कार्यक्रमांना उपस्थितीती लावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मजबूत राहण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये न्याय्य जागावाटणी व्हावी, अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर मांडल्याची माहिती मिळते.
advertisement
मुंबई-ठाण्यासाठी भाजपचा प्लॅन, शिंदेंनी केली मोठी मागणी...
मुंबईत महायुती आणि इतर ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिले आहेत. मुंबईतही २२७ पैकी १५० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही मोजक्याच जागा मिळण्याची चिन्हे आहेत. तर, ठाण्यातही भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. अशातच उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींकडे महत्त्वाची मागणी केल्याचे वृत्त आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले की, मुंबई महापालिकेत महायुतीतील प्रमुख घटक म्हणून शिवसेनेला किमान ५० टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याचबरोबर, ठाणे आणि कल्याण महापालिका या शिवसेनेच्या पारंपरिक सत्ता असलेल्या जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरपालिकांमध्ये ७० टक्के जागा शिवसेना (शिंदे गट) ला देण्याची मागणीही शिंदे यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका निवडणुकीआधी ‘महायुती’मध्ये जागावाटणीची समीकरणं स्पष्ट व्हावीत, यासाठी शिंदे यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचे त्यांनी म्हटले.
शनिवारी दिल्लीत झालेल्या या बैठकीत पंतप्रधान आणि शिंदे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकजूट राखून लढावी, अशी भूमिका देखील एकनाथ शिंदे यांनी मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
